सर्परुपी दहशतवाद्यांना बिळातून बाहेर काढून फणा ठेचणार   

बिहारमधील सभेत मोदी यांचा इशारा
 
कारकट : सर्परुपी दहशतवाद्यांनी पुन्हा फणा काढला तर त्यांना बिळातून बाहेर खेचून काढू आणि त्यांचा फणा ठेचू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिला. 
 
बिहारमधील कारकत येथील मेळाव्यात मोदी बोलत होते. भारतीय सैन्य दलाने दहशवाद्यांचे तळावर हल्ला करुन पहलगामचा दहशतवादी हल्ला करणार्‍यांच्या म्होरक्यांची आश्रयस्थाने नष्ट केली आहेत. ऑपरेशन सिंदूर हा दहशतवाद्यांवर भारताने मारलेला एक भात्यातील  एक बाण आहे. दहशतवादाविरोधातील कारवाई अजून संपुष्टात आलेली नाही. ती तात्पुरती थांबली असून ती सुरूच राहणार आहे, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. 
 
ते म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दुसर्‍या दिवशी  बिहारच्या मधुबनी येथे माझी सभा झाली होती. तेव्हा मी दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, त्यांना मातीत गाडले जाईल, असे आश्वासन दिले होते. मी पुन्हा बिहारमध्ये आलो असून दिलेले आश्वासन मी पूर्ण केले आहे. 
 
भारतीय महिला आणि भगिनी सिंदूर वापरतात. त्या नावाने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरची ताकद पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी व जगाने अनुभवली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या छायेखाली दहशतवादी सुखाने नांदत होते. कारवाईनंतर त्यांना आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले आहे. दहशतवादी तळ आणि लष्करी ठाणी सैन्याने नष्ट केली आहेत. हा नवा भारत असून तो पहिल्यापेक्षा अधिक शक्तीशाली झाल्याचे कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. 

Related Articles